टोईंग चालकांच्या मनमानीला आळा घालण्याबरोबरच वाहन चालकांना होणारा त्रास टाळण्यासाठी वाहतूक शाखेतर्फे नववर्षापासून नवीन नियमावलीची अंमलबजावणी केली जाणार आहे. रस्त्याच्या कडेला अथवा नो-पार्कींगमध्ये उभी केलेली वाहनं अनेकदा टोईंग करून नेली जातात. मात्र टोईंग करून नेलेली वाहनं कुठे नेली आहेत हे शोधणं अनेकदा त्रासदायक ठरतं. वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी हा त्रास कमी करण्यासाठी नवीन नियमावली लागू केली आहे. वाहन उचलून नेण्यापूर्वी याबाबत टोईंग व्हॅनमधून उद्घोषणा केली जाणार आहे. तसंच वाहन कुठे नेलं जात आहे त्याचा स्टीकर उचललेल्या वाहनाच्या जागी लावला जाणार आहे. त्यामुळं वाहन चालकांचा त्रास कमी होईल. या संपूर्ण कारवाईचं चित्रीकरणही केलं जाणार असून याची अंमलबजावणी १ जानेवारीपासून सुरू होणार आहे.