वाहतूक नियमांच्या प्रबोधनात महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अर्चना मणेरा यांनी वसंत लिला गार्डन कोर्ट येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात वाहतुकीच्या नियमांविषयी पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी मार्गदर्शन केले. वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर मणेरा यांनी महिला दिनी वाहतूक नियमांच्या प्रबोधनाविषयी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. देशाबरोबरच महाराष्ट्रात रस्ते अपघातांची संख्या वाढत आहे. बहुसंख्य अपघातांना मानवी चुका कारणीभूत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळणे गरजेचे आहे, असे सांगून पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी वाहतुकीच्या नियमांची माहिती दिली. तर आपला जीव मोलाचा असल्याने प्रत्येक महिलेने आपल्याबरोबरच आपले कुटुंबियही वाहतूकीचे नियम पाळतील, यासाठी कटाक्षाने लक्ष द्यावे, असे आवाहन अर्चना मणेरा यांनी केले.