ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासनानं वाहतुकीचं नियोजन करणं गरजेचं आहे अशी मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. नौपाड्यातून घोडबंदरला जायला अर्धा अर्धा तास लागतो. घोडबंदर रस्त्यावरून होणा-या अवजड वाहनांच्या वाहतुकीचं नियोजन करण्याची गरज डावखरे यांनी व्यक्त केली आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. विशेषत: घोडबंदर रोड, कळवा, भिवंडी बायपास परिसरात दिवसभर कोंडी असते. ठाणे शहरात जेएनपीटी आणि नाशिकहून येणारी जड- अवजड वाहने ये-जा करतात. परिणामी ठाणे शहरातील नागरिकांना दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या प्रकरणी लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी निरंजन डावखरे यांनी केली आहे.