उष्णतेच्या वाढत्या त्रासामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद ठाणे आरोग्य विभागामार्फत जनतेला काळजी घेण्याबाबत जिल्हा आरोग्य अधिका-यांनी काही सूचना केल्या आहेत. शरीराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध, गोंधळलेली अशी व्यक्ती दिसल्यास त्वरित १०२/१०८ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी गंगाधर परगे यांनी केले आहे. अशा व्यक्तीला थंड ठिकाणी किंवा सावलीमध्ये तातडीने हलवावे. शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यांवर थंड पाण्याचा मारा करावा. शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा. प्रौढांमध्ये शरीराचे तापमान 104 फेरहाईट पर्यंत किंवा 40 डिग्री सेल्सिअस पोचल्यास तीव्र डोकेदुखी, स्नायूचे आखडणे, मळमळणे, उलटीचा भास होणे, चिंता वाटणे, चक्कर येणे, हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे अशी लक्षणं दिसल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तर लहान मुलांमध्ये आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे, लघवीचे कमी झालेले प्रमाण, शुष्क डोळे, कुठूनही रक्तस्त्राव होणे तोंडाच्या जवळील त्वचा कोरडी होणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उन्हाच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे विशेषतः दुपारी बारा ते तीन या वेळेत घराबाहेर जाऊ नये. दुपारच्या वेळी स्वयंपाक करणे टाळावे, स्वयंपाकावेळी दरवाजे खिडक्या उघड्या ठेवाव्यात जेणेकरून स्वयंपाक घरात हवा खेळती राहील. उन्हात शारीरिक कष्टाची कठोर कामे टाळावी. चप्पल, बूट न घालता उन्हात चालू नये.लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना आत मध्ये ठेवून गाडी बंद करू नये. चहा, कॉफी, मद्य, खूप साखर असलेली आणि कार्बोनेटेड द्रव्याचे सेवन टाळावे. प्रथिनांची अधिक मात्रा असलेले पदार्थ तसेच शिळे अन्न खाणे टाळावे अशा सूचना करण्यात आल्या आहेत. सैलसर आणि सुती कपडे शक्यतो पांढरे कपडे वापरावेत. डोक्यावर टोपी रुमाल किंवा छत्री वापरावी. पुरेसे पाणी प्या, ताक, लिंबू पाणी नारळ पाणी असे द्रव्य पदार्थ घ्या. गर्भवती स्त्रिया वैद्यकीय समस्या असणाऱ्या कामगारांनी उन्हात काम करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आलं आहे.