ठाण्यात काल वटपौर्णिमेचं व्रत महिलांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावानं साजरं केलं. तमाम हिंदू स्त्रिया आपल्या पतीसाठी वटपौर्णिमेचं व्रत आवर्जून करतात. वड हा भारतात सर्वत्र आढळणा-या वृक्षांपैकी एक वृक्ष आहे. या वृक्षाशी निगडीत असलेल्या या सणामागची पौराणिक कथा म्हणजे सावित्री सत्यवानाची. सावित्रीनं सत्यवानाचे प्राण परत मिळवण्याकरिता प्राण घेऊन जाणा-या यमराजाला आपल्या भक्तीनं संतुष्ट केलं आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली सत्यवान पुन्हा जिवंत झाला ते झाड होतं वडाचं. त्यावेळी सावित्रीनं वडाची मनोभावे पूजा केली. यामुळेच आज सुध्दा स्त्रिया वडाची पूजा करतात. हिंदू स्त्रिया वटवृक्षाची मनोभावे पूजा करून अखंड सौभाग्याची आणि जीवनाच्या दृढतेची प्रार्थना करतात. तसंच पतीला वटवृक्षासारखंच दीर्घ आयुरारोग्य आणि कुटुंबासाठी स्थैर्य लाभू दे अशी मागणीही त्या करतात. वटवृक्षाला अक्षय्यत्वाचं आणि अमरत्वाचं वरदान आहे. त्यामुळं त्याची पूजा करून आत्मियता साधण्याचा प्रयत्न वटपौर्णिमेच्या दिवशी करण्यात येतो. हल्लीच्या बदलत्या युगामध्ये घरामध्येच वटवृक्षाची एखादी फांदी आणून तिची पूजा करण्याची प्रथा वाढत आहे. पर्यावरणवाद्यांनी वडाच्या फांद्यांची नव्हे तर वडाच्या झाडाची पूजा करावी असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी वडाची फांदी विकत घेण्यासाठीही महिलांची झुंबड उडाल्याचं चित्र ठिकठिकाणी दिसत होतं. विविध मंदिरांमध्ये असणा-या वडाच्या झाडाची पूजा करून वटपौर्णिमेचं व्रत महिलांनी साजरं केलं.