ठाण्यात उद्यापासून लॉकडाऊन होणार असल्यामुळे आज सलग तिस-या दिवशी नागरिकांनी किराणा सामान आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र पहायला मिळालं. उद्या सकाळपासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पुढील १० दिवस काहीही मिळणार नाही या भीतीने नागरिक मोठ्या संख्येनं घराबाहेर पडले. ठाण्यातील काही महत्वाचे रस्ते, भाजी मार्केट इथे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करताच गर्दी केल्याचं दिसत होतं. ठाण्याच्या जांभळी नाका मार्केटमध्ये अगदी सकाळपासूनच नागरिकांची भाजी खरेदीसाठी झुंबड उडाली होती. त्यामुळे काल आणि आज भाज्यांचे भाव अचानक वाढल्याचं दिसून आलं. टोमॅटो ८० रूपये किलो, फ्लॉवर १०० रूपये तर कोथिंबीरीची जुडी ८० रूपयांना विकली जात होती. गवार, सिमला मिर्ची ८० रूपये किलो तर पालक आणि मेथीच्या जुडीसाठीही आज चक्क दुप्पट पैसे मोजावे लागल्यानं नागरिक संताप व्यक्त करत होते. एकीकडे लॉकडाऊनमुळे आधीच गेले ३ ते ४ महिने हैराण झालेला सामान्य माणूस आता अचानक पुन्हा भाज्यांचे वाढलेले दर पाहून हवालदिल झाल्याचं पहायला मिळालं. तर हमाली आणि ट्रान्सपोर्टचे दर वाढल्यानं भाज्या महागल्याचं एका विक्रेत्यानं सांगितलं.