लॉकडाऊनच्या नियमांवरून सध्या सर्वत्र संभ्रम असून नक्की काय निर्णय शासनाने घेतले आहेत याची कल्पना नसल्यामुळे व्यावसायिकांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांचाही गोंधळ उडाल्याचं दिसत आहे. शासनानं सोमवारपासून लॉकडाऊनचे नवे निर्बंध लागू केले. यामध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस या नवीन उत्परिवर्तनामुळे शासनानं सर्व जिल्ह्यांचा तिस-या स्तरात समावेश केला. ठाणे शहर हे त्यापूर्वी दुस-या स्तरात होते. मात्र तिसरा स्तर लागू झाल्यामुळे पूर्णवेळ उघडी राहणारी दुकानं, आस्थापना यांना ४ वाजता आपले व्यवहार बंद करावे लागणार होते. मात्र याची कल्पना नसल्यामुळे अनेक दुकानं आणि आस्थापनांनी ४ नंतरही आपले व्यवहार सुरू ठेवले होते. यावेळी पोलीसांनी आवाहन करून दुकानं बंद करायला लावली. ठाण्याच्या बाजारपेठेत तर पोलीसांतर्फे ४ वाजता दुकानं बंद करण्याचं आवाहन माईकवरून केलं जात होतं. दुसरीकडे सर्वसामान्य ठाणेकरांना याची कल्पना नसल्यामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ठाणेकरांचा बंद दुकानं पाहून हिरमोड झाला.