गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रतिवर्षी २ कोटी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देऊनही साडेसहा कोटीहून अधिक बेरोजगार भारतात आहेत. याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंतप्रधानांना शेकडो बेरोजगारांचा बायोडेटा पाठवण्यात आला. बेरोजगारीची आकडेवारी उघडकीस येईल म्हणून बेरोजगार विषयक अहवाल दडपण्याचे आदेश मोदींनी दिले आहेत अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली. ठाण्याच्या दमाणी इस्टेट येथील टपाल कार्यालयात शेकडो बेरोजगारांनी आपला बायोडेटा, पदव्यांची प्रमाणपत्रं आदी कागदपत्रं एका लिफाफ्यामध्ये टाकून ती पंतप्रधानांच्या ७ रेसकोर्स या पत्त्यावर पाठवली. बेरोजगारांची आजची संख्या काढली तर ती ६.८ टक्के आहे. लोकांच्या मनातील उद्रेक दाखवण्यासाठी हा बायोडेटा मोदींना पाठवण्यात आला. दिलेलं आश्वासन न पाळल्यास माफी मागण्याची परंपरा या देशाची आहे. पण तेही मोदींना समजत नाही अशी टीका यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली.