रेल्वेच्या पादचारी पूलासाठी महापालिकेनं उर्वरीत निधी तात्काळ रेल्वेकडे जमा करावा, एलफिस्टन सारखी एखादी दुर्घटना घडल्यास त्याला महापालिका जबाबदार असेल असा इशारा खासदार राजन विचारे यांनी दिला आहे. ठाणे रेल्वे स्थानकातून रोज ७ ते ८ लाख प्रवासी ये-जा करत असतात. सध्या रेल्वे स्थानकातील पूल अपुरे पडत आहेत. एलफिस्टन सारखी एखादी दुर्घटना घडू नये म्हणून पालिका आयुक्तांना स्मरणपत्र पाठवून उर्वरीत निधी वर्ग करण्याची मागणी विचारे यांनी केली आहे. धोकादायक झालेल्या पादचारी पूलाच्या कामासाठी २०१९ मध्ये २४ कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते. महापालिकेनं त्यापैकी ८ कोटी रूपये रेल्वेकडे जमा केले होते. उर्वरीत रक्कम पुढील अर्थसंकल्पीय वर्षात देण्याचं महापालिकेनं म्हटलं होतं. पण अद्यापही हा निधी न मिळाल्यामुळे रेल्वेनं धिम्या गतीनं काम सुरू ठेवलं आहे. महापालिकेनं रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईवर पैसे खर्च न करता ठाणेकरांच्या मूळ गरजा लक्षात घेऊन पादचारी पूलासाठी उर्वरीत निधी रेल्वेकडे वर्ग करावा. भविष्यात एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी महापालिकेवर असेल असा इशाराही विचारे यांनी दिला आहे.