शासनानं रिक्षा मीटर दरवाढ केल्यानंतर सध्या रिक्षा मीटर एजन्सीकडून रिक्षा चालकांची लूटमार होत असून यावर तोडगा न काढल्यास रस्त्यावर उतरावं लागण्याचा इशारा प्रहार जनशक्ती रिक्षा-टॅक्सी युनियननं दिला आहे. शासनानं रिक्षाच्या दरात तीन रूपयांनी वाढ केली आहे. ही वाढ झाल्यानंतर मीटरमध्येही ही वाढ करावी लागणार आहे. यासाठी मीटर एजन्सीकडून बदल करून घ्यावा लागणार असून यासाठी शासनानं ७०० रूपये दराची निश्चिती केली आहे. मात्र ठाण्यातील विविध मीटर एजन्सीज् रिक्षा चालकांकडून १ हजार रूपये मागत आहेत. ही लूटमार असून ठाण्यातील सर्व रिक्षा संघटना आणि शासनानं नोंदणीकृत केलेल्या मीटर एजन्सीची संयुक्त बैठक बोलवून यावर तोडगा काढावा अन्यथा रिक्षा चालकांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा प्रहार जनशक्ती रिक्षा-टॅक्सी युनियननं दिला आहे.