रिंगरोडवरील अपघात रोखण्यासाठी कल्याण रिंगरोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कल्याण, डोंबिवली, टिटवाळ्यासह ग्रामीण भागाला जोडण्यासाठी रिंग रोड प्रकल्प महत्त्वाचा आहे. या रिंगरोडचे काम पूर्ण स्वरुपात झालेले नाही. रिंगरोड मार्गातील गावदेवी मंदिर कोलिवली ते गांधारी, बीएसयूपी प्रकल्प, अटाळी पूल, वडवली पर्यंत या रस्त्याचे काम झाले आहे. वडवली पुढील टप्प्याचे काम एमएमआरडीएच्या वतीने सुरु आहे. रस्त्याचे काम सुरु असले तरी काही दुचाकीस्वार या रस्त्याचा वापर वाहतुकीसाठी करतात. तर निर्जनस्थळ असल्याने काही दुचाकीस्वार या रस्त्यावर स्टटंबाजी करत दुचाकी चालवतात. काही दुचाकीस्वारांचे ग्रुप या रस्त्यावर दुचाकी रेस लावतात. गेल्या दोन तीन महिन्यात या रस्त्यावर 8 च्या आसपास अपघाताच्या घटना घडल्या असून तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच या ठिकाणी काही तरुण सायंकाळच्या वेळी नशा करण्यासाठी आजूबाजूच्या जंगल परिसराचा आडोसा घेऊन तेथे पार्ट्या करताना आढळून आले आहेत. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी दगड लावून हा रस्ता बंद करण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर झीकझॅक पद्धतीने दगड लावून ठेवण्यात येणार आहेत. जेणेकरुन काही दुचाकीस्वारांनी आपली वाहने रस्त्यावर घुसवली तरी त्यांच्या वाहनांचा वेग हा मर्यादित राहील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.