राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी जिल्ह्यातून १० प्रकल्पांची निवड झाली असून त्यातील ४ प्रकल्प हे एकट्या सुलोचनादेवी सिंघानिया स्कूलचे आहेत. 28 वी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेची राज्यस्तरीय परिषद आभासी पद्धतीने संपन्न झाली. या आभासी परिषदेचं आयोजन एकाच वेळी मुंबई, पुणे चिंचवड, नाशिक, धुळे आणि चंद्रपूर या 5 केंद्रातून ऑनलाईन केले गेले. परिषदेचा मुख्य विषय शाश्वत जीवनासाठी विज्ञान हा होता. राज्यातील 22 जिल्ह्यातील निवडक बाल वैज्ञानिकांनी आपले 116 संशोधन प्रकल्प सादर केले होते. त्यापैकी 30 उत्कृष्ट प्रकल्पांची निवड राष्ट्रीय स्तरासाठी केली गेली. या 30 प्रकल्पात जिल्ह्याचे 10, मुंबई 4 , धुळे 3, नाशिक, कोल्हापूर, रायगड प्रत्येकी 2 तर उस्मानाबाद, नंदुरबार, रत्नागिरी, चंद्रपूर, जळगाव आणि बीड जिल्ह्याचा प्रत्येकी एक प्रकल्प निवडला गेला. जिल्ह्यातील १० प्रकल्पांमध्ये ठाण्यातील श्रीमती सुलोचनादेवी सिंघनिया शाळेचे सर्वात जास्त म्हणजे 4 प्रकल्प निवडले गेले आहेत.