राष्ट्रवादी काँग्रेसनं धरण फोडणारा खेकडा पोलीसांना देत जलसंधारण मंत्र्यांचा अनोख्या पध्दतीनं निषेध केला. तिवरे धरण फुटल्यानंतर हे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचा दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण हे या घटनेला जबाबदार नसल्याचं सांगत सावंत यांनी चव्हाणांची पाठराखण केली. त्यावेळी केलेल्या विधानामुळं सध्या संताप व्यक्त केला जात आहे. आज आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नौपाडा पोलीस ठाणे गाठले आणि पोलीसांच्या हातात खेकडे देऊन जलसंधारण मंत्र्यांनी सांगितलेले हेच ते खेकडे आहेत, ह्यांनीच धरण फोडलं आहे, या खेकड्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत खेकडे पोलीसांच्या स्वाधीन केले. तिवरे धरण फुटल्यामुळे २३ जण वाहून गेले तर १० जण अद्यापही बेपत्ता आहेत. त्यामुळं जलसंधारण मंत्र्यांच्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसनं अनोख्या पध्दतीनं निषेध केला.