राज्यातील कारागृहे ही सुधारगृहे व्हावीत, यासाठी कारागृह आणि सुधारसेवा विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्यातील कारागृहांमध्ये 50 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या बंद्यांना स्वखर्चाने अंथरुण आणि उशी आणण्याची परवानी देण्यात आली आहे. कारागृह विभागातील अडी-अडचणी जाणून घेवून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भात परवानगीबाबतचे परिपत्रक सर्व प्रादेशिक विभाग प्रमुख आणि सर्व कारागृह अधीक्षक यांना परिपत्रक पाठवण्यात आले आहे. राज्यातील कारागृहांमध्ये 50 वर्षे आणि त्यावरील वयाचे बंदी असून त्यात काही वयोवृद्ध बंदी आजारी असतात. अशा बाबींचा सारासार विचार करून 50 किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व न्यायाधीन बंद्यांना साधारणतः अंथरूण तसेच उशी स्वखर्चाने आणण्याची परवानगी देण्यात आली.