यंदाच्या खरीप हंगामात ६५ हजार ९०९ हेक्टरवर भात या प्रमुख पीकासह अन्य खरीप पीक लागवडीचं नियोजन करण्यात आलं. खरीप लागवडीच्या नियोजनासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हे नियोजन करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा फटका यंदा खरीप लागवडीस बसला आहे. दरवर्षी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली याबाबतची बैठक होते. मात्र आचारसंहिता लागू असल्यानं जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. गेल्यावर्षी ५८ हजार ७०० हेक्टरवर १ लाख ४४ हजार २२९ मेट्रीक टन उत्पादन घेण्यात आले. यंदा जिल्ह्यात ६५ हजार ९०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाणार आहे. भाताच्या लागवडीसाठी १० हजार ६७० क्विंटल बियाण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. २ हजार २६० हेक्टरवर नागली तर १ हजार २१० हेक्टरवर तृणधान्य घेतलं जाणार आहे. यंदा भाताच्या पीकाचे उत्पादन वाढवण्यासाठी सुधारीत बियाणांचा वापर, लागवड पध्दतीत बदल तसंच कडधान्याच्या उत्पादन वाढीसाठीही प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आलं आहे.