बिकट परिस्थितीत यश मिळवणं हे कौतुकास्पद असून जीवनात पुढे जाण्यासाठी नियोजनबध्द शिक्षण घ्या आणि मोहाची दुनिया सोडून जाताना माणूसपण सोडू नका असा सल्ला महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी एकलव्य विद्यार्थ्यांना दिला. समता विचार प्रसारक संस्थेतर्फे आयोजित एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रमात बोलताना हेरवाडे यांनी हा सल्ला दिला. हे यश साधेसुधे नाही. कुठल्याही साधना संघर्षाशिवाय शक्य नाही. संघर्ष हा कष्टक-यांच्या पाचवीलाच पुजलेला असतो असं सांगून आजचे एकलव्य म्हणजे शुध्द सोनं असल्याचं कौतुक हेरवाडे यांनी केलं. ब-याच कष्टाने आणि संघर्षातून तुम्ही दहावी पास झालात, पुढील शिक्षण, करिअर योग्य माहिती घेऊन निवडा, ध्यास सोडू नका, तुम्ही खरोखर तारे जमीन पर आहात अशा भावना १९९४ चे एकलव्य गौरव पुरस्कार प्राप्त प्रशांत बने यांनी व्यक्त केल्या. समाजात जाती, धर्माचं विष पेरलं जात असून आर्थिक, सामाजिक विषमता वाढवण्यासाठी शासकीय यंत्रणा वापरली जात आहे. त्यामुळे पुढील काळात पिडीत, शोषित जनसमूहांना अधिक संघर्ष करावा लागणार असल्याचं समता विचार प्रसारक संस्थेच्या जगदिश खैरालिया यांनी सांगितलं.