पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला धाडसी अर्थसंकल्प देशाला महासत्तेकडे नेणारा आहे.पायाभूत सुविधांसह रस्ते, परिवहन,संरक्षणापासून ते सुरक्षेपर्यंत भारताला अर्थशक्ती बनवण्याचा एक सुदृढ पाया आहे.असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांनी ठाण्यात एका पत्रकार परिषदेत केले. केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी राणे ठाण्यात आले होते. केंद्र सरकारच्या २०२१ -२२ च्या ३४ लक्ष ८३ हजार कोटींच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना राणे यांनी यापुर्वी केंद्रातील काँग्रेससह कोणत्याही सरकारने इतका मोठा पल्ला गाठला नव्हता असे नमुद केले.कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला.भारतालाही त्याचा सामना करावा लागला.अशा परिस्थितीत,आर्थिक स्त्रोतांमध्ये वाढ करण्यासह, नवे कर लावणे स्वाभाविक होते.मात्र, या अर्थसंकल्पात करांमध्ये काहीही वाढ करण्यात आलेली नाही आणि महागाई दर देखील ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.पायाभूत सुविधांचा विकास,रस्ते,परिवहन,कृषी क्षेत्र,संरक्षणापासून ते आरोग्य सुरक्षेपर्यंत भारताला अर्थशक्ती बनवण्याचा एक सुदृढ पाया समाविष्ट करण्यात आला आहे.तेव्हा,हा सर्वांसाठीचा अर्थसंकल्प देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारा असल्याचे सांगितले.
अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या आघाडी सरकारवर ताशेरे ओढताना नारायण राणे यांनी, मुख्यमंत्र्यासहित बजेट किती जणांना कळते असा सवाल करून राज्य सरकारने गेल्यावर्षी इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्चच केला नसल्याचे सांगत पीडब्लुडीने फेब्रुवारीपर्यत एकुण खर्चाच्या अवघा ४१ टक्केच खर्च केला.उर्वरीत ६० टक्के उरलेल्या दोन महिन्यात कसा पल्ला गाठणार अशा शब्दात नारायण राणेंनी खिल्ली उडवली.