मेट्रो मार्फत सुरू असलेली सर्व बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे पालिका आयुक्त यांचे आदेश

ठाणे महापालिका क्षेत्रात मेट्रोमार्फत रस्त्यावर सुरू असलेली सर्व बांधकामे पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी दिले. ठाणे महापालिका क्षेत्रात मेट्रोच्या दोन मर्गिकांचे काम सुरू आहे. या मार्गिकांखालील रस्ते, दुभाजक, पदपथ यांच्या कामाचा आढावा आयुक्त बांगर यांनी मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी आणि महापालिका अभियंते यांच्या उपस्थितीत घेतला. मेट्रो कामासाठी आवश्यक तेवढे बॅरिकेड्स ठेवून इतर भाग वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच, मेट्रो खालच्या रस्त्यावर माती, डेब्रिज राहणार नाही याची दक्षता घेतली जावी. स्वच्छतेचे काम तसेच दुभाजकाची व्यवस्था येत्या १५ दिवसात पूर्ण होईल, अशी अपेक्षा आयुक्त बांगर यांनी व्यक्त केली. त्याबद्दल मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवली. मेट्रोतर्फे पहिल्या टप्प्यात तीन हात नाका ते माजिवडा या मार्गावर मेट्रो गर्डर लगत उद्यान विकसित केले जाणार आहे. त्याबद्दल एक सादरीकरण दाखविण्यात आले. या सुशोभीकरण कामात सौंदर्य दृष्टी ठेवून काम व्हावे, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली. मेट्रोच्या कामांसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सनी रस्त्याचा मोठा भाग व्यापला आहे. त्यातून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. ही कामे कालबद्ध पदधतीने पूर्ण होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन आयुक्त बांगर यांनी केले. त्यावर, गायमुख ते कापूरबावडी येथील रस्त्यावरील बॅरिकेड्स १५ फेब्रुवारीपर्यंत आणि कापूरबावडी ते माजिवडा येथील बॅरिकेड्स मे महिन्यापर्यंत हटविण्याचे नियोजन असल्याची माहिती मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading