मेट्रोच्या कारशेडसाठी जागेचा तिढा आता सुटल्यात जमा आहे. घोडबंदर रोड येथील १०० एकर जागेवर या कारशेडसाठी आरक्षण टाकण्यात आले होते. पण स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या विरोधामुळे याचे सर्वेक्षण होऊ शकलेले नव्हते. आरक्षण टाकलेली जमीन १९६० पासून १६७ शेतक-यांकडे होती. शेतकरी यावर भातशेती आणि इतर व्यवसायही करत होते. आरक्षणामुळे शेतक-यांवर झालेल्या अन्यायाची दखल घेऊन आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय नेला होता. त्यानुसार शेतक-यांना त्यांचा मोबदला देण्यासाठी बैठक लावण्याचे आदेश देण्यात आले होते. आज या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्वेक्षण करत असताना जे शेतकरी जमीन कसतायत त्यांच्या नावाची नोंद जागेवर करावी, शेतक-यांना विश्वासात घ्यावे, कारशेड आणि महापालिकेला जागा दिल्यानंतर उरलेल्या जागेवर कोणत्याही प्रकारचे आरक्षण न टाकता ती जमीन सर्व शेतक-यांना विभागून द्यावी, पर्यावरणाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या खारफुटीच्या जागेव्यतिरिक्त मोकळी जागा निवासी क्षेत्रात शेतक-यांच्या नावे करून द्यावी, कारशेड विकसित करताना स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधिका-यांनी मान्य केल्यामुळे उद्यापासून सर्वेक्षणाला सुरूवात केली जाणार आहे आणि यामुळे मेट्रो कारशेडचा तिढाही सुटल्यात जमा आहे.