राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या एकूण ३० प्रकल्पात जिल्ह्यातून ७ प्रकल्पांची निवड झाली आहे. आज एका पत्रकार परिषदेत बालविज्ञान परिषदेचे समन्वयक सुरेंद्र दिघे यांनी ही माहिती दिली. बालवयामध्ये विज्ञानाची आवड जोपासली जावी, त्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन प्राप्त व्हावा हे बालविज्ञान परिषदेचं प्रमुख उद्दिष्ट असून या परिषदेच्या माध्यमातून बालवैज्ञानिक आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधन आणि वैज्ञानिक पध्दतीचा वापर करून त्या प्रत्यक्षात साकारतात. या संशोधनातून भावी संशोधक आणि उद्योजक निर्माण व्हावे असा यामागे उद्देश आहे. २९वी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेची राज्यस्तरीय परिषद अलिकडेच झाली. राज्यातील ३६ जिल्ह्यातील प्रकल्प यावेळी सादर करण्यात आले होते. एकूण ३ हजार ५५९ प्रकल्प जिल्हा पातळीवर सादर झाले होते. त्यातील निवडक १०३ प्रकल्पांची राज्यस्तरीय अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. त्यातून आता ३० प्रकल्पांची राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी निवड झाली आहे. या ३० प्रकल्पांत जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ७ प्रकल्प निवडले गेले आहेत. मुंबई उपनगर ४, मुंबई शहर १, नाशिक-रायगड प्रत्येकी ३, पुणे-धुळे-अकोला प्रत्येकी २, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, नंदुरबार, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि यवतमाळ जिल्ह्यातून प्रत्येकी एका प्रकल्पाची राष्ट्रीय परिषदेसाठी निवड झाल्याचं सुरेंद्र दिघे यांनी सांगितलं.