महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मनात स्वत:वर गोळी झाडून घेण्याचे विचार यावेत; हे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने चांगले नाही. त्यामुळे त्यांच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार करुन घ्यावेत, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिला.
नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बुधवारी टीका केली होती. त्यांच्या या टीकेचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. या प्रसंगी पत्रकारांनी दीपक केसरकर यांनी, बंड यशस्वी झाले नसते तर एकनाथ श़िंदे यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली असती, असे विधान केले आहे, याबाबत विचारले असता आनंद परांजपे यांनी हा सल्ला दिला. आनंद परांजपे म्हणाले की, दीपक केसरकर यांच्या वक्तव्यामुळे आपणालाही धक्का बसला. मुख्यमंत्री हे राजकीय विरोधक असले; त्यांच्याशी वैचारिक, सिद्धांतांची लढाई लढत असलो तरी त्यांची प्रकृती स्वस्थ राहिली पाहिजे, अशी प्रार्थना करतो. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नरेश म्हस्के यांना विनंती करतो की, एखाद्या चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जाऊन मुख्यमंत्र्यांवर उपचार करुन घ्यावेत. ठाण्यात डॉ. आनंद नाडकर्णी यांची इन्स्टीटÎूट ऑफ सायकलॉजीक हेल्थ ही जुनी आणि नामांकित संस्था आहे. त्यामाधून त्यांनी उपचार करुन घ्यावेत. कारण, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या मनात अशी गोळी झाडून घेण्याची भावना यावी अन् दीपक केसरकर यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्याने ती बोलून दाखवावी, हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. त्यामुळे त्यांना एवढेच सांगेन की गेट वेल सून!