ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मीटरप्रमाणे येत असलेल्या पाणीबिलाबाबत पाणीपुरवठा विभागाने कृती अहवाल तयार केला असून यापुढे प्रति कुटुंब प्रति महिना 195 रुपये प्रमाणे पाणीबिल आकारणी होणार आहे. नागरिकांना मीटरप्रमाणे येत असलेल्या हजारो रुपयांच्या पाणी बिलाबाबत शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडीप्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून नागरिकांना देखील दिलासा मिळणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने पाणीबील आकारणी ही मीटरप्रमाणे आकारण्यात येत होती. परंतु मीटरप्रमाणे नागरिकांना येत असलेली बिले ही हजारोंच्या घरात असल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता, ही बाब शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणली, तसेच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाला दिलेल्या निर्देशानुसार प्रति महिना प्रति कुटुंब 195 रुपये प्रमाणे पाणी बिल आकारणी यापुढे केली जाणार आहे. या निर्णयाचा फायदा संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मीटर धारकांना होणार आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत पाणी मीटर धारकांना महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाकडून पाण्याची देयके प्राप्त होतील. तसेच यापूर्वी आलेल्या जास्त रकमेची पाणी देयके कमी करण्याकरिता पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी एक संपूर्ण दिवस प्रभागात येतील आणि त्याबाबतची सूचना नागरिकांना दिली जाईल असेही मिनाक्षी शिंदे यांनी नमूद केले.