मास्क न वापरणा-या अडीच हजाराहून अधिक व्यक्तींकडून साडेबारा लाखांचा दंड महापालिकेनं वसूल केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना सार्वजनिक ठिकाणं, शासकीय कार्यालयं, खाजगी कार्यालयं याठिकाणी मास्क न वापरणा-या व्यक्तींची संख्या वाढत आहे. अनेक लोकं बेफिकीरीनं वागत आहेत. असं असताना कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महापालिका आयुक्तांनी अशा बेफिकिर व्यक्तींविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनानं अशी कारवाई सुरू केली. महापालिकेच्या ९ प्रभाग समितीअंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत अडीच हजाराहून अधिक व्यक्तींकडून सुमारे साडेबारा लाख रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये नौपाडा प्रभाग समितीमधून सर्वाधिक म्हणजे ४६८ तर वागळे प्रभाग समितीमधून सर्वात कमी म्हणजे १८४ व्यक्तींकडून दंड वसूल करण्यात आला. वर्तकनगर प्रभाग समिती ३५४, माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती ३४९, उथळसर प्रभाग समिती २८०, कळवा २४५, मुंब्रा १८५, लोकमान्यनगर २४०, तर दिवा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये १९५ व्यक्तींविरूध्द अशी कारवाई करण्यात आली. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असून मास्क न वापरणा-या व्यक्तींवर ५०० रूपयांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.