कोविडचा वाढता संसर्ग लक्षात घेवून संभाव्य संकट टाळण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सींग नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर शहरात मास्कचा वापर न करणाऱ्या 305 नागरिकांकडून दोन दिवसात तब्बल दीड लाखाहून अधिकचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांवर आणि सोशल डिस्टन्सींगचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात असून दंड वसूल करण्यात येत आहे. महापालिका क्षेत्रात प्रभाग समिती निहाय पथक तयार करण्यात आले असून दररोज मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसात मास्कचा वापर न करणाऱ्या 305 जणांकडून प्रत्येकी 500 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत 13 हजार, कळवा-साडेसोळा हजार, उथळसर -12 हजार, माजीवडा प्रभाग समिती- साडे अठरा हजार, वर्तकनगर – साडेअकरा हजार, लोकमान्य सावरकर नगर 14 हजार, नौपाडा-कोपरी साडे त्रेचाळीस हजार, वागळे प्रभाग समिती 12 हजार तर दिवा प्रभाग समितीत साडेअकरा हजार असा एकूण 1 लाख 52 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.