ठाण्यातील मासुंदा तलावात नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यासाठी संरक्षक विभाग उभारावा अशी मागणी धर्मराज्य पक्षाच्या नितीन देशपांडे यांनी केली आहे. ठाणे महापालिकेनं १८ कोटी रूपये खर्चून मासुंदा तलावाचं बेकायदेशीरपणे सुशोभिकरण केलं. सुशोभिकरणानंतर केवळ महिनाभरातच मासुंदा तलावाच्या बाजूला उभारलेल्या काचा तुटल्या. या तलावाच्या सुशोभिकरणातही घोटाळा झाला असावा. यामुळे त्रयस्थ संस्थेमार्फत याची चौकशी करावी आणि त्याचा अहवालही जाहीर करावा. सुशोभिकरणामुळे कमी पावसातही तलाव भरून वाहतो. या पाण्याच्या दाबामुळे तलावाभोवतीच्या काचा फुटतात तसंच रेलिंगमध्ये कमी अंतर असल्यामुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक तसंच दिव्यांगांना या तलावाचा आनंद लुटताना एखादी जिवितहानी होऊ शकते. यासाठी तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा तलाव संरक्षक विभाग उभारावा अशी मागणी नितीन देशपांडे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.