माझी वसुंधरा या उपक्रमात ठाणे महापालिकेची पहिल्या फेरीत निवड झाली आहे. त्यामुळे ठाण्यात अधिक ग्रीन स्पेस निर्माण होणार आहे. ठाणे शहरात वृक्षांची लागवड करण्यापासून ते वृक्ष संवर्धन करणे यासंदर्भात सखोल चर्चा आयुक्तांशी करण्यात आली. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये तौक्ते चक्रीवादळामुळे शहरातील झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संदर्भात आयुक्तांना माहिती देण्यात आली असून अशा परस्थितीमध्ये भविष्यात निगा आणि देखभालीची योग्य ती उपाययोजना सक्षमपणे करण्याचा प्रयत्न वृक्ष प्राधिकरणच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची ग्वाही आयुक्तानी दिली. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष प्राधिकरण विभागा मार्फत शहरात अधिक वृक्ष लागवड उपक्रम आयोजित करण्यात यावे, जेणेकरून पर्यावरणाचा समतोल आणि शहराची जैवविविधता राखण्यास मदत होईल. या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपण नुसते वृक्ष लागवड नव्हे तर प्रत्येकानी एक झाड लावून त्याला आपले नाव द्यायचे आणि त्या वृक्षाला दत्तक घेऊन त्याची निगा-देखभाल स्वतः करायची असा “इच वन प्लांट वन” हा अनोखा उपक्रम राबविण्यात यावा अशी मागणी यावेळी वृक्ष प्राधिकरण सदस्यांनी आयुक्तांकडे केली आहे.