महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील तक्रारींची जनसुनावणी मंगळवार 23 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि आयोगाच्या सदस्या या स्वत: तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. जिल्ह्यात होणाऱ्या या जनसुनावणीत अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन न घाबरता आपल्या तक्रारी यावेळी मांडाव्यात असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे. या सुनावणीनंतर ठाणे जिल्ह्याची आढावा बैठक होईल. जिल्हा दौरा दरम्यान वन स्टॉप सेंटर तसेच महिला वसतीगृहास ही आयोगाच्या अध्यक्षा भेट देणार आहेत. राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. महिलांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. या जनसुनावणीवेळी पोलीस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यांना या उपक्रमाचा फायदा होतो. महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत सुनावणी दरम्यान नव्या तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. त्यामुळे आपली कैफियत मांडणाऱ्या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग याद्वारे करत आहे.