खाजगी बस सेवेशी स्पर्धा करताना “प्रवासी हाच आपला परमेश्वर” असे मानून आणि प्रवाशांच्या सेवेसाठी” या ब्रीदवाक्यानुसार प्रवाशांना उत्तम दर्जाची सेवा द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 5 हजार 150 इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या. या बसेसच्या लोकार्पण सोहळा येथील खोपट बस स्थानक या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 5 हजार 150 इलेक्ट्रिक बस आपण देत आहोत. काळ बदलतोय, स्पर्धात्मक जगात पुढे जातोय, अशा परिस्थितीत पर्यावरण रक्षणाचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची गरज निर्माण झाली आहे. एसटी ही महाराष्ट्राची लाईफ लाईन आहे. “गाव तिथे रस्ता, गाव तिथे एसटी” या ब्रीदवाक्यावर अनेक ठिकाणी एसटी ची बस सेवा खेडोपाडी पोहोचते. अनेक वर्षांपासून एसटी चालक-वाहक आणि गावकरी यांचे ऋणानुबंध जुळले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. सध्या बोरिवली – ठाणे – नाशिक मार्गावर ही इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होत आहे.
ते पुढे म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी महापालिकांना निधी देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. ग्रामीण भागातील लोकांनाही वातानुकूलित सेवा मिळणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांनाही चांगल्या सोयीसुविधा मिळायला हव्यात, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. चांगली सेवा देणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांना वेतनिक लाभ देण्यात यावेत, असे निर्देश दिले. ते म्हणाले की, एस.टी आगार स्वच्छ असले पाहिजे, तिथे आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा असाव्यात. शासनाकडून औद्योगिक विकास महामंडळाला एसटी सुशोभिकरणासाठी सहाशे कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यातून एस.टी. आगारातील रस्ते चांगले व्हावेत, रंगकाम व्हावे, इतर सोयीसुविधा निर्माण केल्या जाव्यात, ही अपेक्षा आहे.राज्यात 173 पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई-चार्जिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नागरिकांना चांगली सेवा देवून आपल्या एस.टी. ला नफ्यात आणू, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी शेवटी केले.
You must be logged in to post a comment.