ठाणे महापालिकेच्या ४० व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रम पत्रिकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा महापालिकेला विसर पडला आहे. या प्रकरणी भाजपाचे माजी नगरसेवक नारायण पवार यांनी हरकत घेतली असून, नवनियुक्त आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे पत्राद्वारे कडक कारवाईची मागणी केली आहे. ठाणे महापालिकेच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने प्रशासनाच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाबरोबरच पालकमंत्री शंभूराज देसाई, स्थानिक खासदार -आमदारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. मात्र त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही हे धक्कादायक आहे असे नारायण पवार यांनी आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्य सरकारकडून प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री यांचे नाव नमूद करण्यात आलेले असते. तो राजशिष्टाचाराचाच भाग आहे. मात्र, ठाणे महापालिकेने केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोहळा होत असल्याचा उल्लेख केला आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि निषेधार्ह आहे. तरी या प्रकरणी गंभीर दखल घेऊन संबंधितांविरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी नारायण पवार यांनी केली आहे.