काही कवी, लेखक आणि साहित्यिकांनी मराठी भाषेवर आक्रमण होत असल्याची ओरड बंद करावी. कारण तीस वर्षांपूर्वी मराठी वागमय मंडळाचे कार्यक्रम करताना जो उत्साह होता तोच उत्साह आजच्या युवापिढीमध्ये काठोकाठ भरलेला आहे. मराठी भाषा पेलण्यास आणि टिकविण्यात नवी पिढी सक्षम असल्याचे गौरोदगार लेखक आशुतोष भालेराव यांनी काढले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त जोशी – बेडेकर महाविद्यालयातील मराठी भाषा आणि साहित्य विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भाषा ही प्रवाही असते. ती सातत्याने बदलत राहते. इतर भाषेतील नवनवीन शब्द घेऊन ती समृद्ध होते. आजच्या तरुणांनी मराठी पुस्तके वाचली पाहिजेत. स्वतःला व्यक्त होऊ देण्यासाठी लेखनही पाहिजे असे विचार आशुतोष भालेराव यांनी व्यक्त केले. मराठी भाषेला समृद्ध असा वारसा लाभलेला आहे. या समृद्ध भाषेचे आपण पाईक आहोत ही अतिशय भाग्याची गोष्ट असल्याचे प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी पारंपरीक वेशभूषा परिधान करून संपूर्ण वातावरण मराठमोळे केले होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून विद्यार्थ्यांनी उपस्थितांची दाद मिळविली.