मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास आता गारेगार होणार असून मध्य रेल्वेवरही वातानुकुलित उपनगरीय सेवेला सुरूवात झाली आहे. खासदार राजन विचारे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. २०१५ मध्ये भावेश नकाते या युवकाचा गर्दीमुळं रेल्वेतून पडून मृत्यू झाला होता. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी रेल्वेत सुधारणा करण्यासाठी एक समिती नेमली होती. या समितीच्या बैठकीत वातानुकुलित उपनगरीय सेवा सुरू करण्याची मागणी खासदार राजन विचारे यांनी सुरू केली होती. त्यानंतर पश्चिम रेल्वेवर वातानुकुलित सेवा सुरू झाली. ठाणे रेल्वे स्थानकातूनही वातानुकुलित रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी पुन्हा एकदा विचारे यांनी केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेनं हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल अशी वातानुकुलित रेल्वे सेवा सुरू केली. आता ठाणे, छत्रपती शिवाजी टर्मिनस, कल्याण अशी वातानुकुलित सेवा सुरू होत असून या गाड्यांच्या फे-या वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असं राजन विचारे यांनी सांगितलं.