मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने १० महिन्यांत १२३६ मुलांची सुटका केली. यामध्ये मुंबई विभागाने सर्वाधिक म्हणजे ५३९ मुलांना वाचवले. जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ही सुटका करण्यात आली. रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहे.
मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने शासकीय रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत गेल्या १० महिन्यांत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवरील १२३६ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ८२२ मुले आणि ४१४ मुलींचा समावेश आहे आणि चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे. काही भांडणामुळे अथवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर इत्यादींच्या शोधात आपल्या कुटुंबियांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित आरपीएफ जवानांकडून शोधली जातात. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक ५३९ मुलांची सुटका केली, ज्यात ३७८ मुले आणि १६१ मुलींचा समावेश आहे.