मध्य रेल्वेचा सातत्यानं महाराष्ट्रातील गाड्यांवर अन्याय सुरू असून लोकप्रतिनिधींना मात्र याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचं दिसत आहे. कोयना एक्सप्रेस आणि पनवेल-पुणे एक्सप्रेस या गाड्या वारंवार रद्द करण्यात येत आहेत. गेले ६ महिने सातत्यानं हा प्रकार सुरू आहे. प्रत्येकवेळी रेल्वे गाड्या चालू करण्याच्या नवीन तारखा जाहीर करते आणि परत नंतर या गाड्या रद्द करते. गेले काही महिने हा खेळ सुरू आहे. या गाड्या रद्द करताना मंकी हिल येथील कामाचं कारण पुढे केलं जात आहे. मात्र याच वेळेस सुटणारी पुणे-हजरत निजामुद्दीन ही दुरांतो गाडी वेळेत चालू आहे. तसंच दक्षिणेकडे जाणा-या गाड्याही चालू आहेत. पुण्याहून कल्याण, वसई, गुजरातकडे जाणा-या गाड्याही सुरू आहेत. फक्त महाराष्ट्रातल्या दोन शहरांना जोडणा-या गाड्यांपुरताच मंकी हिल येथील कामाला अडथळा येत असल्याचं या गाडीतून नियमित प्रवास करणा-या प्रवाशांचं म्हणणं आहे. पनवेल-कर्जत पॅसेंजर रद्द असल्यानं प्रवाशांचे हाल सुरूच आहेत. पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आल्यामुळं कर्जत ते लोणावळा या प्रवासाकरिता प्रवाशांना मेल एक्सप्रेसचं तिकिट घ्यावं लागत असल्यानं आर्थिक भुर्दंडही होत आहे. परंतु रेल्वे मंत्रालय अथवा लोकप्रतिनिधींना याकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.