ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागात मोठा भ्रष्टाचार असून याची चौकशी करावी अशी मागणी कांदळवन सनियंत्रण समिती सदस्य राजीव दत्ता यांनी मुख्य सचिवांकडे केली आहे. वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे शहरामध्ये वृक्षांचे जीआयस आणि जीपीएस टॅगिंग करण्यात आले आहे. मात्र यामध्ये विकासकांना मोठा फायदा करून दिला जात असल्याचा राजीव दत्ता यांचा आरोप आहे. वृक्ष प्राधिकरणातर्फे जीआयएस आणि जीपीएस टॅगिंगची माहिती संकेतस्थळावर देणं बंधनकारक असताना त्याची अंमलबजावणी वृक्ष प्राधिकरणानं केलेली नाही. यामुळं जीआयएस आणि जीपीएस टॅगिंगचे नकाशे आणि इतर वृत्तामध्ये म्हणजेच वृक्षांचे अक्षांश रेखांश सार्वजनिक होत नसल्यानं त्यामध्ये फेरफार केला जातो. शहरामधील एका प्रकरणात असा प्रकार झाला असून याप्रकरणी वृक्ष प्राधिकरण समिती सदस्यानेच तक्रार केली होती. या तक्रारीनंतर याबाबत नगरविकास विभागाकडून अहवालही मागवण्यात आला आहे. मात्र नकाशे आणि इतिवृत्तामध्ये फेरफार करून हा अहवाल सादर करण्यात येईल आणि सत्य लपवण्याचा प्रयत्न होईल असा आरोप राजीव दत्ता यांनी केला आहे. यासाठी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी राजीव दत्ता यांनी केली आहे.