राज्यामध्ये मद्याच्या मोजक्या बाटल्या आणण्याची परवानगी आहे पण काही लोक टेम्पो भरून मद्याच्या बाटल्या आणतात. एकच व्यक्ती असा गुन्हा करताना तिस-यांदा आढळली तर त्याच्यावर मोक्का खाली कारवाई केली जाईल अशी माहिती उत्पादन शुल्कमंत्री शंभुराज देसाई यांनी ठाण्यात बोलताना दिली. जिजाऊ सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. असा एक प्रस्ताव पोलीस महासंचालकांना पाठवण्याचे आदेश उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील ४ मोठे उद्योग राज्याबाहेर जायला राज्यातील दिरंगाई कारणीभूत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्योजकांबरोबर कोणीही चर्चा केली नाही. मंत्रीमंडळ उपसमितीची बैठकही झाली नाही. या दिरंगाईला कंटाळूनच उद्योग बाहेर गेल्याचं शंभुराज देसाई यांनी सांगितलं.