भीक मागण्यासाठी दोन वर्षाच्या मुलीचं अपहरण करणा-या दोघांना ठाणे पोलीसांनी अटक केली आहे. भीक मागणा-या टोळ्या कार्यरत असून अशाच एका भिकारी टोळीतील महिलेनं एका २ वर्षाच्या मुलीचं ठाणे रेल्वे स्थानकातून अपहरण केलं होतं. जालन्यामधील यमुना नरवडे या आपल्या गावावरून कामधंद्यानिमित्त ठाण्याला आल्या होत्या. ५ वर्षाचा मुलगा आणि २ वर्षाची प्राजक्ता यांच्यासह त्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या बाजूला मोकळ्या जागेत राहत होत्या. दिवसभर भंगार गोळा करून मुलांचं संगोपन त्या करत होत्या. २६ सप्टेंबरच्या रात्री त्या फलाटाच्या बाहेरील पदपथावर झोपल्या असताना रात्रीच्या सुमारास त्यांची मुलगी प्राजक्ताला कुणीतरी पळवून नेले. याप्रकरणी त्यांनी कोपरी पोलीसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचं गांभीर्य पाहून पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाचा तपास त्वरीत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीसांनी तपासाला सुरूवात केली. कुर्ला रेल्वे स्थानकात काही भिका-यांच्या टोळ्या कार्यरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यातील काही लोकं भीक मागण्यासाठी मुलांचं अपहरण करतात अशीही माहिती हाती आली. त्यातूनच यामागे एक महिला आणि तिचा ११ वर्षाचा मुलगा असल्याचा छडा पोलीसांना लागला. त्यानुसार पोलीसांनी अनिता भोसलेला ताब्यात घेतलं आणि तिच्याकडून अपहरण झालेल्या प्राजक्ताची सुटका केली. तिने सीमा पवारनं या मुलीचं अपहरण केलं असल्याची माहिती दिली. पोलीसांनी सहपोलीस आयुक्त सुरेश मेखला यांच्या उपस्थितीत प्राजक्ताला तिच्या आईच्या ताब्यात दिले.