जिल्ह्यातील ३ मतदारसंघांपैकी भिवंडी मतदारसंघात गेल्या २ निवडणुकांपेक्षा यंदा मतदानात वाढ झाल्याचं दिसत आहे. जिल्ह्यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण असे लोकसभेचे ३ मतदारसंघ आहेत. भिवंडी हा मतदारसंघ तुलनेनं ग्रामीण असतानाही गेल्या ३ निवडणुकांमध्ये मतदान वाढत असल्याचं दिसत आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये ३९.३८ टक्के मतदान झालं होतं. २०१४ च्या निवडणुकीत ५१.६२ टक्के तर यावेळच्या निवडणुकीत ५३.६८ टक्के मतदान झालं आहे. कल्याणमध्येही गेल्या २ निवडणुकांच्या तुलनेत यंदा मतदानात वाढ झाल्याचं दिसत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये ३४.३२ टक्के, २०१४ मध्ये ४२.९४ टक्के तर यावेळच्या निवडणुकीत ४४.२७ टक्के मतदान झालं आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात मात्र गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळच्या निवडणुकीत मतदानात घट झाल्याचं दिसत आहे. २००९च्या निवडणुकीत ठाणे लोकसभा मतदारसंघात ४१.४४ टक्के मतदान झालं होतं. तर २०१४ ला ५०.८७ टक्के मतदान झालं होतं. तर यावेळी मात्र मतदानाची टक्केवारी घसरल्याचं दिसत असून यावेळी ४९.२३ टक्के मतदान झालं आहे.