भिवंडी येथे तळ अधिक मजल्याची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे तर २५ जण जखमी झाले आहेत. आता जेसीबी यंत्राद्वारे इमारतीचा राडारोडा काढण्याचं काम सुरू करण्यात आलं असून अद्यापही काही रहिवासी या ढिगा-याखाली असावेत असा अंदाज व्यक्त होत आहे. काल या इमारतीतील १० रहिवाशांचा मृत्यू झाला होता. संध्याकाळनंतर नाजो अन्सारी, सनी शेख, अस्लम अन्सारी, नजमा अन्सारी, अफसाना अन्सारी, अमान शेख, शाहीद खान, असद खान, नरीमा शेख आणि अरीफ शेख या १० जणांचा मृत्यू झाल्यामुळं या दुर्घटनेत एकूण २० जणांचा बळी गेला आहे. तळ अधिक तीन मजले असलेली ही इमारत काल पहाटेच्या सुमारास कोसळली. भिवंडीमध्ये ही इमारत अतिशय दाटीवाटीच्या भागात असल्यामुळं इमारत कोसळल्यानंतर मदत पोहचवण्यामध्येही बराच वेळ गेला. मात्र अशा परिस्थितीतही टीडीआरएफ आणि मदत करणा-या विविध पथकांकडून अनेक जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. यामध्ये अगदी लहान बाळाचाही समावेश होता. ही मदत वेळेवर मिळाली असती तर आणखी काही जणांचा जीव वाचू शकला असता. यंत्रमागाच्या खडखडाटामुळे ही इमारत कमकुवत होऊन पडल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. ही इमारत पडल्यामुळं एकूणच जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.