पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्ममधील पहिल्या वर्षाच्या विकासपर्वाची गाथा सांगण्यासाठी काल झालेल्या मुंबई-कोकण प्रांताच्या रॅलीत भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांबरोबरच हजारो ठाणेकरांनी सहभाग घेतला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून वर्षभरात घेण्यात आलेल्या क्रांतीकारी निर्णयांची माहिती देण्यात आली. तर वर्षानुवर्षे रखडलेलेले निर्णय घेतल्याने जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले. कोरोनाच्या आपत्तीत घेतलेले धाडसी निर्णय, आत्मनिर्भर भारताचा नारा, पीपीई किट्स निर्यातीत यश आदींबरोबरच वर्षभराच्या काळात बालाकोटवरील सर्जिकल स्ट्राईक व एअर स्ट्राईकने भारताचे शौर्य जगाने पाहिले. वन रॅंक वन पेंशन, वन नेशन-वन टॅक्स जीएसटी आदी दशकभरापूर्वीच्या मागण्या पूर्ण झाल्या. शेतकऱ्यांना उत्तम एमएसपी मिळाली. कलम ३७०, राम मंदिर उभारण्याचा निर्णय, तिहेरी तलाक, नागरिकत्व कायदा आदी निर्णयाने देशात नवा अध्याय रचला गेला, असे स्मृती इराणी यांनी नमूद केले. मजबूत लष्करासाठी चीफ ऑफ डिफेंस पद, मिशन गगनयानची तयारी, पंतप्रधान किसान सन्मान निधी, जल जीवन मिशन, प्राण्यांसाठी मोफत लसीकरण मोहिम, शेतकरी, शेतमजूर, लहान दुकानदार आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना मासिक पेन्शन आदी निर्णयांची माहिती व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये देण्यात आली.