शहरातील धोकादायक इमारतींचं पुनर्वसन करण्यासाठी गेल्या ४ वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावावर तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. ठाणे शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न गेली बरीच वर्ष रखडला आहे. यामुळं अशा इमारतींमधून अनेक कुटुंबं जीव मुठीत धरून राहत आहेत. अशा इमारतींच्या पुनर्वसनासाठी ठाणे महापालिकेनं १५ सप्टेंबर २०१५ ला २ किंवा त्यापेक्षा अधिक चटईक्षेत्र देण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. मात्र गेली ४ वर्ष यावर निर्णय होऊ शकलेला नाही. हा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित असल्याचं सांगितलं जातं. या इमारती शहरामध्ये विविध भूखंडावर विखुरल्या असल्यानं त्यांना झोपडपट्टी पुनर्वसन अथवा समूह विकास योजनेचा लाभ मिळत नाही. म्हणून या प्रस्तावावर तातडीनं निर्णय घेऊन अध्यादेश काढावा अशी मागणी महेंद्र मोने यांनी नगरविकास मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.