महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया या मार्गावरील वॉटर टॅक्सी सेवेचा शुभारंभ बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते बेलापूर जेट्टी येथे झाला. वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबईला 55 मिनिटांमध्ये पोचता येणार आहे. मुंबई आणि परिसरातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी जलवाहतुकीला चालना देण्यात येणार असल्याचे भुसे यांनी यावेळी सांगितले. वॉटर टॅक्सी सेवेच्या उद्घाटनानंतर मंत्री महोदयांनी वॉटर टॅक्सीतून बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया असा प्रवास केला. वॉटर टॅक्सी सेवेमध्ये एकूण 200 प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतात. ही सेवा नयनतारा शिपिंग कार्पोरेशन आणि इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेसमार्फत चालविण्यात येणार आहे. रस्ते मार्गावरील ताण कमी करण्यासाठी बेलापूर ते गेट वे ऑफ इंडिया ही वॉटर टॅक्सी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे प्रवासाच्या वेळेची व इंधनाची बचत होऊन वाहनांचे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. या सेवेचे दर कमी करण्यासाठी तसेच सेवेच्या सुविधा वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच जेट्टीपासून ते इच्छितस्थळी जाण्यासाठी कनेटिव्हिटी निर्माण करण्यावरही भर देण्यात येत असुन नवी मुंबई विमानतळामुळे या सेवेचे महत्त्व वाढणार असल्याचं दादा भुसे यांनी सांगीतलं.