शहराबरोबरच ग्रामीण भागातही जोरदार पाऊस होत असल्यामुळं जिल्ह्यातील जवळपास सर्व धरणं भरली असून अनेक धरणातून पाण्याचा विसर्गही सुरू झाला आहे. जोरदार पाऊस, त्यातच धरणातून पाण्याचा होणारा विसर्ग यामुळं जिल्हा जलमय होऊन गेला आहे. बारवी धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळं आजूबाजूची गावं पाण्याखाली गेली होती. कल्याणातही महापूर आला होता. कल्याणचे सर्व प्रवेशाचे मार्ग बंद झाले होते. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला बारवी धरणातून पाणी पुरवठा होतो. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होत असल्यामुळं या धरणातून कालपासून पाण्याचा विसर्ग सुरू होता. या धरणाची पाणी ओसंडून वाहण्याची पातळी ७२.५० मीटर आहे. तर काल रात्री धरणातील पाण्याची पातळी ७२.५६ मीटरवर गेली होती. त्यामुळं धरणातून पाण्याचा जोरदार विसर्ग सुरू होता. आज सकाळी ही पातळी घटल्यामुळं कल्याणपासून पुढच्या परिसरात साचलेल्या पाण्याची पातळी घटून ७२.४१ मीटर झाली आहे. कालपासून बंद असलेली कल्याण- बदलापूर रेल्वेसेवाही आता पूर्ववत झाली आहे. यामुळं प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.