फेरीवाला धोरण राबवा त्यानंतरच आत्मनिर्भर योजना अंमलात आणा – मिनाक्षी शिंदेंची मागणी

पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनाच्या वतीने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एका बाजूने फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते तर दुस-या बाजूने त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. अशा परिस्थितीत नाहक फेरीवाला भरडला जात आहे. आधी फेरीवाला धोरण राबवा त्यानंतरच आत्मनिर्भर योजना राबवा अशी मागणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांकडे केली आहे. तसेच ठाणे पालिकेची ही दुटप्पी भूमिका असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे. सध्या कोरानाच्या पार्श्वभुमीवर अनेक फेरीवाल्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, त्यांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी महापालिकेच्या वतीने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. सध्या विशेष सुक्ष्म पुरवठा योजनेची अंमलबजावणी सुरु असून कारवाई करून फेरीवाले आत्मनिर्भर होतील का असा सवाल यावेळी शिंदे यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांना एक प्रकारे कर्ज उपलब्ध केल्यामुळे फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीचा विचार करता अशा फेरीवाल्यांची परिस्थिती आई जेवू घालीना, बाप भिम मागू देईना अशी झाली असल्याने पालिका आयुक्तांनी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading