प्रत्येक विद्यापीठांमध्ये देखील युवा साहित्य संमेलने व्हावीत – उदय सामंत

युवा साहित्य संमेलनासारख्या उपक्रमामुळे तरुण पिढी सक्षम होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात अशी युवा साहित्य संमेलने व्हायला हवीत. राज्यातील विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील तरुणांच्या साहित्य कलांना वाव देण्यासाठी प्रत्येक विद्यापीठांमध्ये देखील युवा साहित्य संमेलने व्हावीत, यासाठी कुलपती तथा राज्यपाल यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च -तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. कोकण मराठी साहित्य परिषद आणि ठाणे महानगरपालिका यांच्या वतीने आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. त्यावेळी सामंत बोलत होते. दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनाची सुरुवात सकाळी ग्रंथ दिंडीने झाली. विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरस्वती पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून संमेलनाचे उद्घाटन झाले. कोणतीही निवडणूक न होता संमेलनाध्यक्षांची निवड करण्याचा चांगला पायंडा युवा साहित्य संमेलनाने पाडला आहे. अशा प्रकारचे संमेलन ग्रामीण भागात व्हावे, यासाठी पुढील संमेलन रत्नागिरीत घेण्याचे निमंत्रण आताच देत आहे, असे सांगून सामंत म्हणाले की, सध्या सुरू असलेली ग्रंथालये का बंद पडत आहेत, मुलांपर्यंत साहित्य कसे पोचेल आणि वाचन संस्कृती कमी का होत आहे, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अशी संमेलने आयोजित करायला हवीत. साहित्याला राजाश्रय मिळायला हवा. मात्र, राजकिय अभिनिवेष त्यामध्ये येता कामा नये. कथा, कविता कशी लिहाव्यात, नवीन साहित्याची निर्मिती कशी करावी, यासाठी युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांनी तरुणांना मार्गदर्शन करावे. महाराष्ट्रातील साहित्यिकांची परंपरा पुढे चालविणारा तरुण साहित्यिक निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता बदलली आहे. अशा संमेलनातून विद्यार्थ्यांची ती मानसिकता बदलण्यास मदत होते. कोकण साहित्य परिषदेची चांगली पुस्तके तरुणांपर्यंत जाण्यासाठी ही पुस्तके राज्यातील सर्व ग्रंथालयामार्फत पोचविण्यात येतील, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले. आजकालची मुले वाचत नाहीत, हे खरे आहे का ते तपासले पाहिजे. कारण इन्स्टाग्राम, फेसबुक सारख्या माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण लिहित असतात. मुंबई, पुणे या परिघाबाहेरही खूप मोठा महाराष्ट्र आहे. या परिघाबाहेरील तरुणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाचनाची ऊर्जा आहे, ती जाणून घेता यायला हवी. आजही अनेक तालुक्यात पुस्तकांची दुकाने नाहीत. अशा ठिकाणी पुस्तकांची दुकाने सुरू करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घ्यावा.संमेलनाध्यक्ष सखदेव म्हणाले. संमेलनाच्या निमित्ताने काढलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन उदय सामंत यांच्या हस्ते झाले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading