ठाण्याच्या पोलीस वसाहतीतील मोडकळीस आलेल्या इमारती लवकरच कात टाकणार आहेत. पोलीस वसाहतीतील मोडकळीस आलेल्या इमारतींची डागडुजी आणि नवीन इमारतीबाबत आमदार संजय केळकर यांनी राज्य सरकार आणि गृह सचिवांकडे पाठपुरावा सुरू केला असून लवकरच या इमारतींसाठी पुरेसा निधी मिळण्याची शक्यता आहे. या इमारतींमध्ये राहण्यायोग्य घरे उपलब्ध होणार असल्याने शेकडो पोलीस कुटुंबांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सेंट्रल मैदान परिसरात असलेल्या पोलीस वसाहतीतील इमारती मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत. येथील सहा इमारतींसह ए, बी आणि सी या इमारतींमधील घरे नादुरुस्त असून पोलीस कुटुंबांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ही घरे खाली करण्याच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. या इमारती आणि त्यातील घरांची डागडुजी करून त्यांना येथेच घरे उपलब्ध व्हावीत या भूमिकेतून आज संजय केळकर यांनी पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि पोलीस वसाहतींचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आहे त्या ठिकाणीच दुरुस्ती करून राहण्यायोग्य घरे मिळावीत अशी भूमिका मांडली. इमारत दुरुस्तीसाठी या पूर्वीच गृह सचिवांना भेटून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून फडणवीस-शिंदे सरकारकडे याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. जरीमरी येथील इमारत पाडून नवीन इमारत बांधण्याची योजना तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे गेली दोन वर्षे धूळ खात पडून आहे. तर क्रमांक ए, बी आणि सी या इमारतींजवळही मोडकळीस आलेली इमारत पाडून नवीन इमारत उभी करण्याची योजना प्रलंबित आहे.