गेले दोन दिवस झालेल्या तुफानी पावसात महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यरत होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ठाण्यामध्येही शनिवारपासून जोरदार पाऊस सुरू असून ठाण्यामध्ये ठिकठिकाणी पाणी साचलं होतं. महापालिका मुख्यालयासह प्रभागस्तरीय यंत्रणा, आपत्कालीन नियंत्रण यंत्रणा कार्यरत होत्या. टीडीआरएफच्या दोन तुकड्या, सहा बोटी, उपायुक्त, दोन सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता मदतीसाठी कार्यरत होते. जवळपास ४ हजाराहून अधिक रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यात आलं. रघुकुल सोसायटीमधील २५ रहिवासी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. श्रीरंग आणि वृंदावनमध्येही महापालिकेतर्फे मदतीसाठी बोटी पाठवण्यात आल्या होत्या. श्रीरंग-वृंदावन गृहसंकुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. तळ मजल्यापर्यंत पाणी आल्यामुळं तळ मजल्यावरील रहिवाशांना वरच्या मजल्यावर सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन पालिकेतर्फे केलं जात होतं.