जिल्ह्यात काल झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं. कल्याणमधील खडवली येथील जू गावही संपूर्ण पाण्याखाली गेलं होतं. याची माहिती मिळताच तात्काळ एनडीआरएफ आणि वायुदलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं जू गावातील ५९ ग्रामस्थांना कोलशेत येथील वायुदलाच्या केंद्रावर हलवण्यात आलं. पूर परिस्थितीतून सुटका करण्यात आल्यानंतर या सर्व ग्रामस्थांना प्रथमोपचार देण्यात आले. तसंच या ग्रमस्थांची नाश्ता, जेवण, पाणी आणि राहण्याची व्यवस्था बाळकूम येथील एका शाळेत करण्यात आली होती. पालकमंत्र्यांनी या ग्रामस्थांची भेट घेऊन विचारपूस केली. कैलास पालवे यांनी दिलेल्या माहितीमुळे जू गावातील ग्रामस्थांची तातडीनं सुटका करणं शक्य झालं. वायुदलानंही तात्काळ मदतीचा हात पुढे केल्यानं या ग्रामस्थांची सुखरूप सुटका होऊ शकली.