पावसाळ्यातही ठाण्याला पाणी टंचाईशी सामना करावा लागत असल्याच्या निषेधार्थ कळवा-मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापौरांना बिसलेरी पाण्याच्या बाटल्यांचा एक खोका भेट म्हणून पाठवला. शाई धरण बांधण्याची मागणी करूनही सत्ताधारी शिवसेना त्यावर कोणत्याही प्रकारची भूमिका घेत नाही. पाणी टंचाईवर सामान्य ठाणेकरांची ओरड सत्ताधा-यांच्या कानावर पडत नाही. सर्वसाधारण सभेत यावर चर्चा होऊनही धरण बांधण्याचा ठोस निर्णय घेतला जात नाही. पिण्यासाठी पाणी नसल्यामुळं अनेकांना बिसलेरीचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र ज्यांची कमाई बिसलेरी पाण्याच्या एका बाटलीएवढीच आहे त्यांनी काय करायचं? महापौरांनाही गरीब ठाणेकरांच्या पाण्याच्या समस्येची जाण आहे. जेव्हा जेव्हा शिवसेनेनं चुकीचे निर्णय घेतले त्या त्या वेळी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी विरोध म्हणून आपली खुर्ची सोडली आहे. ठाण्यातील माय भगिनींच्या डोळ्यात पाण्यासाठी पाणी येत आहे याची जाणीव एक स्त्री म्हणून महापौरांना आहे याची माहिती असल्यामुळं एक भाऊ म्हणून आपण महापौरांना हा पाण्याचा खोका भेट देऊन स्वतंत्र धरणाची मागणी करत असल्याचं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.