गेल्या ८ दिवसात ७६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून या पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीची कामं तातडीनं हाती घ्यावीत असे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. ज्या ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत त्या ठिकाणी मास्टीक पध्दतीने दुरूस्ती करावी आणि १२ तासाच्या आत रस्ते दुरूस्त होतील हे पहावं असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. पावसाची उघडीप मिळताच रस्ते दुरूस्तीची कामं हाती घ्यावीत आणि हे रस्ते मास्टीकच्या सहाय्याने दुरूस्त करावेत. या पध्दतीनं केलेली दुरूस्ती ही पावसात टिकून राहत असल्यामुळे त्याचाच वापर करावा अशा सूचनाही महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. प्रभाग समिती निहाय रस्ते दुरूस्तीचा अहवाल प्राप्त व्हावा यासाठी एका कनिष्ठ अभियंत्याची नेमणूक करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. रस्ते कोणाच्या अखत्यारीत येतात हे न पाहता रस्त्यांची दुरूस्ती करावी. याप्रकरणी दिरंगाई, निष्काळजीपणा झाल्यास कारवाईचा इशाराही पालिका आयुक्तांनी दिला.