कोरोना काळात जीवावर उदार होऊन सेवा बजावणार्या 46 डॉक्टरांना कायम ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. कोरोना कमी झाल्यानंतर ठाणे महापालिकेने अतिरिक्त ठरणा-या ४६ डॉक्टरांना कमी करण्याचं ठरवलं होतं. त्यापैकी 38 डॉक्टरांना नोटीसाही बजावण्यात आल्या होत्या. मात्र याला विरोध करत विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत पालिका आयुक्तांशी चर्चा करून त्यांच्यावर अन्याय न करण्याची सूचना केली होती. या डॉक्टरांना 60 हजारांपासून सव्वा लाखांपर्यंतची वेतनश्रेणी देण्यात येत होती. अत्यंत प्रतिकूल स्थितीमध्ये या डॉक्टर्संनी काम केले त्यामध्ये अनेक डॉक्टरांना तर कोरोनाचीही लागण झाली होती. मात्र आता रुग्णसंख्या कमी होऊ लागल्यानंतर या डॉक्टरांना कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सूचनेनंतर पालिका आयुक्तांनी या डॉक्टरांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.